स्वप्न हरवले कुठे आकाश कवेत घेतांना
आकांक्षांचे झाले ओझे न्याय तयांना देतांना
आव्हानाला फुटले धुमारे खांद्यावरती नेतांना
दुष्काळाचा पाठलाग हा जाळतो वनवा शेतांना
कंठ शुष्क झाला आता सुर कुठले गितांना
सूर्य आला डोक्यावर हलाहल हे पितांना
वसंत गेला दारामागे जीर्ण पाने गळतांना
ओसाड झाले जीवन हार दुःखांचा माळतांना
भावनेचा कोंडतो श्वास काळीज घेऊन पळतांना
पाषाणा सम होतो पुतळा सूखे सारी जळतांना
तिमिर गहरा झाला पहाट होती फुलतंना
पिचुन गेली कंबर भार अश्रूंचा झेलतंना
जखमा झाल्या ओल्या काटयावर चालतांना
खंत खेद ना वेदना नवी क्षितिजे जिंकतांना